खिरेश्वरच्या नेढ्याचा चित्तथरारक अनुभव | A breathtaking experience of Khireshwar Loop | Khireshwar

खिरेश्वरच्या नेढ्याचा चित्तथरारक अनुभव.


      जुन्नरहुन आज लवकरच निघालो होतो. त्यामुळे सकाळचे सुर्योदयाचे विहंगम दृश्य पिंपळगाव जोग धरणाच्या पाण्यात सुंदर असे प्रतिबिंब रुपातही पाहायला मिळत होते. अंगाला जाणवणारी सकाळची बोचरी थंडी, जलाशय परिसरात थव्याने विहार करणारे पक्षी, धरणाच्या पाण्याच्या लाटांचा होणारा मंजुळ आवाज व पक्षांच्या गाण्यांचे कानावर ऐकु येणारे मधुर स्वर सर्व काही आनंद देणारे होते.
   मी, अक्षय व ओंकार हे दृश्य डोळ्यांमधे साठवत खिरेश्वराकडे चारचाकिमधुन चाललो होतो. हरिश्चंद्र गड रांगेचे चारचाकीच्या समोरच्या काचेतून दिसणारे दृश्य पाहून असे वाटत होते की जणू  ती सिनेरीच काचेवर लावली आहे की काय? खिरेश्वर मध्ये दत्ता बहुर्ले व त्याचा मित्र चिंतामण गाईड म्हणून येणार होते. कारण आजपर्यंत कधीही कुणीही न गेलेल्या अवघड व चित्तथरारक ठिकाणी अनुभव घ्यायला जायचे होते. समोरच चिंतामण चे ऐश्वर्या हाॅटेल होत. हाॅटेल छोटसच परंतू कुटुंबाची उपजिविका यावरच त्याची चालते. माणुसकीला जपणारा चिंतामण चारचाकी पाहताच पळत आला. कारण दत्ताने त्यास सांगितले होते कि आज सरांबरोबर आपणास भ्रमंतीला जायचय. चारचाकी पार्क केली व आम्ही खाली उतरलो. दत्ता पोहचला नव्हता. तोपर्यंत चिंतामणने नाष्ट्याला गरमागरम पोहे केले. दत्ता पण पोहचला. चहा नाश्ता करत आमचे जुन्नर दरवाजाने जाण्याची तयारी झाली परंतु त्या रस्त्याने जायचे हे फक्त चिंतामणलाच माहीत. दत्ता पण या रस्त्याने एकदाच गेलेला. चिंतामणला हाॅटेलची ऑर्डर असल्याने येणे शक्य नव्हते. त्यामुळे दत्ता व आम्ही निघालो. एक जिवघेण्या मार्गाकडे. जायचे कसे माहित नव्हते परंतु निघालो मात्र नक्की.
         खुप मोठी रिस्क आज मी घेणार होतो. पुर्वजांनी अशा मोठ्या रिस्क घेतल्याने आपणास आज खुप काही शिकायला मिळते. म्हणूनच एक चान्स घ्यायचाच व तेथील ऐतिहासिक व नैसर्गिक खुणा पहायच्याच व ते पण फक्त आणि फक्त एकट्यानेच हा निर्धार मनात होता. आज पर्यंत खिरेश्वर गावातील एकाही व्यक्तीने येथे जाण्याचे धाडस केले नव्हते. जुन्नर तालुक्यातुन येथे कुणी कधी गेल्याचे ऐकण्यात नाही व यावर कुणी काही लिहिले हे पण वाचनात नाही असे खिरेश्वर ग्रामस्थ सांगतात. ते म्हणतात फक्त तेथे जायचे म्हटले तरी अंगावर काटा येतो. अशा ठिकाणी मला जायचे होते.
     आमचा प्रवास जंगलवाटा तुडवत सुरू झाला तो हरिश्चंद्रगडावर जाणाऱ्या जुन्नर दरवाज्याने. माझ्या निरीक्षणातुन एक गोष्ट लक्षात आली की हरिश्चंद्र गडावर पुर्वी जाण्याची मुख्य वाट म्हणजे हाच जुन्नर दरवाजा असावा. कारण या वाटेवर कोरलेले पायरीमार्ग,हाताच्या बोटांच्या सपोर्ट साठी कातळात कोरलेल्या खोबण्या, घळीतील पाण्याचे टाके, विशिष्ट पद्धतीने खडकात कोरलेल्या पायर्‍या व घळीतील पायरीमार्गावर असलेल्या खिरेश्वर येथील नागेश्वर मंदिराचे दगडी शिल्प खुप काही सांगुन गेले. ही घळ जेथे संपते ते ठिकाण म्हणजेच हरिश्चंद्रगडाच्या बालेकिल्ल्याचा पायथा होय, म्हणुन या मार्गाला खुप महत्व. दुसरा संदर्भ म्हणजे जुन्नर तालुक्यातील असलेले सात किल्ले याच मार्गाने जवळचे. लवकरात लवकर व कुणाच्या निदर्शनास न येता छुप्यामार्गाने येथे पोहचण्याची ही वाट असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. असो
     पाऊल वाटा झपझप तुडवत व मार्ग काढत आम्ही आता तीन चढाईचे टप्पे चढून वर आलो होतो. घड्याळात 10 वाजले होते. उजव्या हाताला ज्या ठिकाणी जायचे होते तो भाग दिसत होता. परंतु राॅकपॅच अवघड वाटत होता. आमच्या कडे कोणतेही चढाईचे साधन नव्हते. सोबत पाण्याच्या बाटल्या व न्याहरीची शिदोरी होती. कॅमेरा व ट्रायपाॅड बगलेत अडकवलेले होते. एक राॅकपॅच दत्ताने बोट करून दाखवत बोलला येथुन आपण चढूया. मी हो म्हटले व चढण्यास प्रारंभ केला. मध्यभागापर्यंत काहीच वाटले नाही परंतु तेथुन पुढे प्रसंग खुपच अवघड होता. दत्ताला सांगत होतो तुम्ही चढू नका. परंतु त्यांनी ऐकले नाही व तेथेच थरथर कापु लागले. त्यांना धिर देत देत सपोर्ट करत कसेबसे थोड्या सपाटीवर पोहचलो. जवळपास एकतास आमचा येथे खर्च झाला. त्या डोंगरावर चढण्यासाठी कुठून जागा मिळते का?  ते मी त्यांना तेथेच थांबवत शोधू लागलो. डोंगराचा पुर्व, दक्षिण व पश्चिम भाग संपूर्ण पायाखाली घालत. चढाई मार्ग शोधु लागलो परंतु यश काही प्राप्त झाले नाही. खुप खिन्न व निराश झालो. कडेकपारीने जुन्नर दरवाजाकडे मित्रांना पुढे या आवाज देत चालू लागलो.
      ते तिघे वाळलेल्या कारव्यांमधून मार्ग काढत घळीच्या वाटेकडे येत होते. मला आता जंगली जनावरांचा मार्ग मिळाला होता. मी पटपट चालू लागलो. घळीतील अर्धी वाट चढून मित्रांची वाट पाहू लागलो. बसल्या बसल्या मला पुरातन कोरीव खुणा उजव्या हाताला दिसुन आल्या. त्यांचा मागोवा घेत घेत मी पुन्हा अवघड कड्याकडे चालु लागलो. अतिशय निसरडी वाट व जवळपास 300 फुट शेजारी खोल दरी. परंतु प्रयत्न सोडायचे नाही हाच निश्चय मनी. आता एका अवघड राॅकपॅच जवळ आलो होतो. तेथुन वर जवळपास पन्नास फुट वर चढायचे होते. चढता येईल का हा विचार करत असताना खाली दरीत उतरण्याचा एक पायरीमार्ग दिसु लागला. काळाच्या ओघात तो पुसला गेला होता. खडकात कोरलेल्या पायर्‍या होत्या. हाताच्या बोटांच्या सपोर्ट खोबण्या मात्र चांगल्या स्थितीत होत्या. वर वळुन पाहीले तर दहा बारा खोबण्या निदर्शनास आल्या. थोडा धीर आला. त्या खोबण्यांच्या मदतीने वर चढायला सुरुवात केली. चढणे अवघड होते परंतु भक्कम व विश्वासु सपोर्ट त्या खोबण्यांचा होता. मित्रांचा आवाज कानी येत होता सर तुम्ही कोठे आहेत. मी आवाज दिला तेथेच घळीत बसून रहा. मला तुमच्या पर्यंत यायला कमीत कमी दिड, दोन तास लागतील. मी कोठे आहे हे त्यांना समजने शक्य नव्हते. परंतु त्या घळीत त्यांना आवाज मात्र पोहचला होता. मी त्यांना पुन्हा ओरडुन सांगत होतो की मी जर दोन तासांनी परत आलो नाही तर तुम्ही कुणीही या मार्गाने वर येऊ नका.मला शोधन्यासाठी पुन्हा माघारी फिरुन खाली खिरेश्वराच्या जंगलात पडलेलो असेल तेथेच शोधा. निरोप देऊन मी ५० फूट कडा चढून एका सपाट भागावर आलो होतो.समोरचे दृश्य खुपच मनमोहक होते. माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मी दक्षिणेकडे चालू लागलो व पुढे पन्नास फुटावर जावून अचानकपणे थांबलो. समोरचे दृष्य पाहून माझा आनंद क्षणात नाहीसा झाला. समोरचे दृश्य खुपचं भयानक होत. जवळपास १५ फुट लांब व एक फुट रूंद एवढी जागा होती की जी मला पार करायची होती.मला ज्या ठिकाणी जायची उत्सुकता होती त्या ठिकाणी पोहचता येईल का? हा मोठा प्रश्न डोळ्यासमोर उभा होता. मी एकटाच होतो. माझा निर्णय मलाच घ्यायचा होता. जर मी सटकलोच तर त्या कड्याला माझे नाव दिले जाईल हे मात्र नक्कीच होत. काय करावे सुचेना. पुर्वेकडे खिरेश्वर दृश्य, दक्षिणेकडे माळशेजघाट दृश्य तर पश्चिमेला तारामती शिखर दृश्य फक्त मान 180 डिग्री फिरवली की दिसत होते.दोन, तीन  हजारहून जास्त खोल दर्या दोन्ही बाजूला राक्षसी  रूपात दिसत होत्या. दृश्य मात्र लाजवाब परंतु भयानक रूपात. क्षणात मी स्वर्गात असल्याचा भास मला झाला. येथुन पुन्हा माघारी परतायचे नाही हाच मी निर्णय घेतला. घोड्याच्या पाठीवर दोन बाजुला पाय सोडून बसावे तसा मी त्या कातळभिंतीवर दोन्ही बाजुला पाय खाली सोडत बसलो. खाली पाय सोडलेल्या दोन्ही बाजूंनी तीन हजार फुट खोल द-या होत्या. हळु हळु मी त्या भिंतीवर पुढे सरकू लागलो. हे दृश्य प्रत्यक्ष कुणी पाहणारा असता तर नक्कीच बेशुद्ध पडला असता. आता १५ फुट अंतर पार झाले होते.येथुन खाली दहाफुट खोल खोबणीत उतरायचे होते. आयुष्यात प्रथमतःच एवढं जीवघेण धाडस मी केले होते. सर्व देवी देवतांची मला आज आठवण होत होती. प्रसंगाला कुणी ही देवता धावून येणे शक्य नव्हते. कारण हा मी केलेला सरळ सरळ मुर्खपणा होता. माझी छोट्यात छोटी चूक मला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावणार होती.  पुढे दहा फुट खोल कातळाच्या नैसर्गिक खाचेत उतरायचे होते. आता माघार नाही हा माझा निर्णय पक्का होता. एकतर मी माझे ध्येय तरी गाठणार नाही तर मृत्यूच्या खाईत तरी फेकलो जाणार हे निश्चित होते. अतिशय सावधपणे मी त्या खोबनित उतरलो. येथे खोबनित तर फक्त अर्धाफुट पेक्षाही कमी जागा उभी राहण्यासाठी होती, परंतु भिती न बाळगण्याचे कारण म्हणजे येथील असलेला पक्का व भरोसेमंद खडक होता. येथुन पण मला ज्या ठिकाणाची जाण्याची उत्सुकता होती ते ठिकाण दिसत नव्हते. पुन्हा मनाचे खच्चीकरण झाले. खुपच नर्वस झालो. खोबनितुन खिरेश्वराच्या दिशेने वाकून पाहिले तर डोळेच फाटले. कारण आता खिरेश्वर बाजुने जवळपास पंचवीस फुट खोल उतरायचे होते. मार्ग अतिशय अवघड होताच. जर येथे फसलोच तर हेलिकॉप्टर शिवाय माझी सुटका होणे नाही हे मात्र नक्की लक्षात येत होते. आणि सटकलोच तर खिरेश्वर गावात समाधी बनणार हे ही तीतकेच खरे होते.
      आता आर या पार हाच पर्याय उरला होता. धाडस करत व मनाची एकाग्रता करत मी खाली पंचवीस फुट उतरलो. उतरताच माझी नजर दक्षिणेला असलेल्या ठिकाणास पाहून नाचू लागली. मी त्या कातळ कड्याचा आधार घेत समोरचे दृश्य पाहून नाचू लागलो. समोरच्या दृश्याचे वर्णन कोणत्या शब्दात करावे असे शब्दच सुचेनासे झाले होते. माझे ध्येय माझ्या समोर मला अलिंगण देण्यासाठी उभे होते.मी परतीच्या मार्गाला काय वाढून ठेवलंय सर्व काही विसरून गेलो होतो. वाचताना वाचक निश्चितच माझी तुलना वेडा, सटकू किंवा अन्य काही करतील यात शंकाच नाही. परंतु मी जे काही पहात होतो अनुभवत होतो ते मात्र माझ्या जीवनात काही वेगळच होत. माझ्या समोर एक निसर्ग निर्मित जवळपास 35 ते चाळीस फुट लांबीचा पिस्तुल आकाराचे नेढ होत. हे कदाचित 2200 वर्षापासुन येथे असावे अशी शंका येऊन गेली. येथील दृश्य पाहण्यासाठी कातळात कोरलेला मार्ग आजही जिर्ण झाले दिसून येत होता. कदाचित तो मार्ग आज चांगल्या स्थितीत असता तर जगातील लाखो पर्यटक येथील दृश्य पहायला निश्चितच आकृष्ट झाले असते. व जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर गावचा इतिहास काही वेगळाच असता. मित्रांनो हे क्षण व हे निसर्ग वैभव मनाच्या कोपऱ्यात व सोबत असलेल्या कॅमेरात टिपायचे थोडेच विसरेल बर. हे तुमच्या पर्यंत पोचायलाच पाहिजे हा माझा नेहमीचा निर्धार असतो. मला माहित नव्हते कि मी माघारी पोहचेल की नाही परंतु ते कॅमेरात टिपण्याचा प्रयत्न करने गरजेचे होते.
     माझी एकाग्रता व एकनिष्ठता माझ्या कामी आली व आपले सर्वांचे "सह्याद्रीचे सौंदर्य या ग्रुपला" असलेल्या अशिर्वादाने मी अतिशय जीवघेण्या प्रसंगातून मित्रांपाशी घळीत सुखरूप पुनर्जन्म रुपात मी 2:00 वाजता पोहचलो. (आपणास विनंती असेल की आपण या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नये) पुन्हा जुन्नर दरवाजाने चढण्यास सुरूवात केली. या जुन्नर दरवाजा मध्ये कोरलेल्या पायर्‍या काळाच्या ओघात व अतिवृष्टीच्या वेगाने वाहणाऱ्या पाण्याने लुप्त होत गेलेल्या दिसून येत होत्या. मी एक एक पावलागणिक केलेल्या मुर्खपणाच्या धाडसाचा पुन्हा डोळ्यासमोर चित्रपट पाहु लागलो होतो....... ते धाडस आपणास पहायचं असेल तर नक्कीच पुढील लिंकवर क्लिक करा पण एक लक्षात ठेवा एक हाथ ह्रदयावर नक्कीच ठेवा लिंक.    https://youtu.be/IEOS2d5T_CE
लेख / छायाचित्र -
श्री.खरमाळे रमेश
 वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
"शिवाजी ट्रेल"
 फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .
  विकसित अंड्राॅईड अॅप- निसर्ग रम्य जुन्नर तालुका अँड्रॉइड अँप डाऊनलोड करीता  लिंक खालील प्रमाणे देत आहोत. त्यावर क्लिक करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.njunnartaluka





Comments

Popular posts from this blog

जुन्नर तहसील के ऐतिहासिक और प्राकृतिक दर्शन| Historical and natural treasure | Junnar

अश्मयुगीन जुन्नर तालुका.(बोरी गावची १४ लाख वर्षांपूर्वीची टेफ्रा राख)

म्हसवंडी व खामुंडी घाट एक नवीन ट्रेक पर्वणी | Mhanswandi and khamundi ghat | Junnar